पुणेकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना, टँकर लॉबीच्या मनमानीने नागरिक हैराण; वॉल्व्ह मॅनची मनमानी, पैसे दिल्याशिवाय सोसायट्यांना पुरेसे पाणी नाही

Pune-Municipal-Corporation-Grapples-with-Rising-Water-Tanker-Costs-1068x563.webp

पुणे – शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. टँकर लॉबीच्या मनमानीमुळे दररोज हजारो टँकर पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पिण्यास योग्य आहे का? ते कुठून भरले जाते? त्याचा स्रोत काय आहे? याची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

पाणी टंचाईतून टँकर व्यवसाय तेजीत

खडकवासला धरणातून दरवर्षी २२ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करून दिले जात असले, तरी अनेक भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जुन्या शहर भागांसह, नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्रणाच नसल्याने टँकर व्यवसाय तेजीत आहे.

बांधकाम परवानग्या आणि नागरिकांची फसवणूक

पीएमआरडीएच्या परवानगीने या गावांमध्ये बांधकामांना गती मिळाली आहे. मात्र, पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय (एनओसी) परवानगी न देण्याचा निर्णय जुलैमध्ये घेतला गेला होता. तरीदेखील महिन्याभरात हा निर्णय मागे घेण्यात आला. बिल्डरांकडून टँकर पाण्याचे आश्वासन देत सदनिका विकल्या जातात. परंतु, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना टँकरसाठी स्वतःची व्यवस्था करण्यास भाग पाडले जाते. परिणामी, नागरिकांना महिन्याला लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागत आहे.

महापालिकेच्या नियोजनाचा अभाव

महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ८२ पैकी ५१ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, जलवाहिनी जोडण्याचे काम दोन वर्षांपासून अर्धवट आहे. त्यामुळे टाक्या असूनही पाणी पुरवठा होत नाही. उलट नागरिकांना टँकरसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

वॉल्व्ह मॅन आणि टँकर लॉबीचा संगनमत

शहराच्या जुन्या हद्दीत वॉल्व्ह मॅन आणि टँकर चालकांच्या संगनमतामुळे पाणी टंचाई निर्माण केली जाते. पाणी कमी सोडल्यामुळे नागरिकांना टँकर मागवावे लागतात. ज्या सोसायट्या वॉल्व्ह मॅनला पैसे देतात त्यांनाच व्यवस्थित पाणी पुरवले जाते, असा आरोप पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनीही मान्य केला आहे.

नागरिकांची हतबलता

टँकर लॉबी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुणेकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. कृत्रिम टंचाईमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Spread the love