पुणे: शिवाजीनगरसह शहरभर वाहतुकीचा गोंधळ; वाहनचालक संतप्त; सायंकाळी वाहतूक कोंडीची रोजची समस्या; उपाययोजना कधी? – व्हिडिओ

IMG_20250114_194313.jpg

पुणे, ता. १५: शहरातील विविध ठिकाणी रोजच सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाजीनगर बस स्टॅंड चौक, कात्रज चौक-कोंढवा रस्ता, घोरपडी, हडपसर, बंडगार्डन रस्ता, कोरेगाव पार्क येथील ब्ल्यू डायमंड हॉटेल परिसर, तसेच चाकण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे वाहनचालकांचा संताप व्यक्त होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

रोजच्या वाहतूक कोंडीमुळे मानसिक त्रास
दररोज सायंकाळी होणाऱ्या कोंडीमुळे वाहनचालकांना वेळेचा अपव्यय तर होतोच, परंतु मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून उलट दिशेने वाहन चालविणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

पहा व्हिडिओ

वाहतूक नियमनासाठी पोलिस अपुरे
शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतूक शाखेवरील ताण अधिकच वाढला आहे. दुसरीकडे, मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे सुरू असल्यामुळे अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक अवघड बनले आहे.

वाहतूक शाखेकडे सध्या एक हजारांपेक्षा कमी मनुष्यबळ असल्याने नियमनात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून योग्य धोरण आखावे, अशी मागणी होत आहे. “याबाबत त्वरित कार्यवाही न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.

प्रशासनाकडून अपेक्षा:
आता नागरिकांची नजर वाहतूक विभागाकडे आहे. मनोज पाटील यांच्या पुढाकाराने या समस्येवर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Spread the love