गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरी शिका..!
‘साक्षरता वारी’च्या रथाचे पालखी सोहळ्यांबरोबर प्रस्थान

पुणे- प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’अशी संज्ञा वापरात आणून केंद्र शासनाने सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी उल्लास नव भारत साक्षरता अभियान सुरू केले आहे. आषाढीवारी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांत ‘उल्लास’च्या प्रचारासाठी योजना शिक्षण संचालनालयाने ‘वारी साक्षरतेची’ रथ समाविष्ट केले आहेत. दोन्ही रथांनी या पालखी सोहळ्यांबरोबर शनिवारी २९ जून रोजी येथून प्रस्थान ठेवले.
शनिवारी सकाळी ११वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात बाल वारकऱ्यांची हातात घोषवाक्ये घेऊन, डोक्यावर तुळशी ठेवून आणि अभंग आणि घोषणा म्हणत बालदिंडी निघाली. साक्षरता वारीच्या रथाचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांच्या हस्ते झाले. यावेळी योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर, पिंपरी चिंचवड प्रशासनाधिकारी संगीता घोडेकर, खेड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी दैवशाला शिंदे, कार्यक्रमाधिकारी विलास पाटील, बाळासाहेब जाधव, प्रदीप शिंदे, पालखी रथाचे समन्वयक संभाजी देशमुख उपस्थित होते. शिक्षण संचालकांसह शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी साक्षरता वारीसाठी उल्लास कार्यक्रमाचे लोगो व नाव असलेले टी-शर्ट घालून विशिष्ट वेशभूषा केली होती, तर विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज इत्यादी संतांच्या वेशभूषा करून आले होते. यावेळी साक्षरतेच्या घोषणाही देण्यात आल्या. पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १४ मधील वारकऱ्यांना उल्लास कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकाचे वाटप करण्यात आले.


तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात समाविष्ट करण्यात आलेल्या ‘साक्षरता वारी’च्या रथाचे उद्घाटन धानोरी- आळंदी येथील जिल्हा परिषद शाळेत दुपारी दोन वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी संचालक डॉ महेश पालकर,
उपसंचालक राजेश क्षीरसागर, योजना व माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, खेड गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, सरपंच अनिल गावडे,उपसरपंच विठ्ठल गावडे, मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, अनिता परदेशी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संचालक महेश पालकर यांनी या प्रचार रथाचा हेतू, उल्लास ॲप, नव साक्षरता कार्यक्रम याविषयी उपस्थित वारकरी,पालक,ग्रामस्थ यांना संबोधित केले. या प्रसंगी धानोरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख दिंडी सोहळा आयोजित केला होता.यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग गायनसह, हरिपाठ पावलीनृत्य सादर केले. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी साक्षरता प्रचाराच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी आलेल्या रिमझिम पावसाने सर्व उपस्थितांचा आनंद द्विगणित केला, त्यानंतर साक्षरता रथ मार्गस्थ झाला.
असा आहे साक्षरता रथ –
साक्षरता प्रचारात मागील वर्षभरात देशपातळीवर दखल घेण्यात आलेल्या सातारा येथील बबई मस्कर यांचे छायाचित्र, बारामती येथील सुशीला व रुचिता क्षीरसागर या आजीं-नातीचे छायाचित्र, रत्नागिरी येथील स्वयंसेविका अनन्या चव्हाण हिने चित्रीत केलेले या योजनेचे सार दर्शवणारे पेंटिंग यासह कार्यक्रमाची माहिती,वैशिष्ट्ये, कार्यवाहीचे टप्पे,विविध समित्या, वैविध्यपूर्ण घोषणा यांची माहिती असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यात उल्लास कार्यक्रमांच्या माहितीपत्रिका (घडीपत्रिका), नोंदणीचे फॉर्म ठेवण्यात आलेआहेत. आळंदी-पंढरपूर मार्गासाठी मंगळवेढा जि. सोलापूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने तर देहू पंढरपूर मार्गासाठी हडपसर-पुणे येथील चॅम्स शिक्षण संस्थेने मिनीबस उपलब्ध करून दिली आहे.
आळंदी पंढरपूर साक्षरता वारी रथातील सदस्य-
साईनंद सोरटे,खंडेराव काळे, ज्ञानेश्वर नाळे, रोहिदास कापसे, विघ्नहर भालेराव,समन्वयक संभाजी देशमुख
देहू पंढरपूर साक्षरता वारीच्या रथातील सदस्य- रमेश कवितके, एकनाथ बडे,लव गायकवाड, मारुती शेंडगे, विकास रासकर