राज्यात पुढील पाच दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, गारपिटीचाही अंदाज

मुंबई | प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा हवामान बदलल्याचे जाणवत असून पुढील काही दिवस विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांत चार दिवस पावसाचे संकेत आहेत. काही भागांमध्ये गारपिटीचा अनुभवही येण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत येत्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणातील मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईतील काही भागांत गेल्या दोन दिवसांत अधूनमधून पावसाने हजेरी लावली असून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे.
मुंबईत तापमान ३० अंश सेल्सियसच्या आसपास असून रात्री ते २८ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुण्यातही तापमान २९ ते ३० अंशांदरम्यान असून दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.
पश्चिमी चक्रवात आणि आर्द्रतेमुळे हवामानात हा बदल झाल्याचे सांगण्यात येते. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता खालावल्याने श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने पूरस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
—