पुणे: गांजा, मटका व्यवसायाच्या विळख्यात विश्रांतवाडी; पोलिस प्रशासनाचे डोळेझाक?; सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईची प्रतीक्षा; तरुणांचे भवितव्य धोक्यात!

पुणे – तरुण पिढीला विनाशाच्या मार्गावर ढकलणाऱ्या गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री विश्रांतवाडी परिसरात खुलेआम सुरू असून, पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर चर्चा आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, विशेषतः टिंगरे नगर कमानी परिसरात, गांजाची सर्रास विक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.
गंजाच्या या अवैध व्यवसायामध्ये “रंज्याचा धंदा” आणि “लताबाई चा धंदा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन ठिकाणांचा उल्लेख वारंवार केला जातो. या ठिकाणी रोज दोन ते तीन किलो गांजाची विक्री होत असल्याचा आरोप आहे. दहा ग्रॅम गांजासाठी 100 ते 120 रुपये आणि पन्नास ग्रॅमसाठी 500 ते 600 रुपये आकारले जात असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या धंद्यांची माहिती परिसरातील लोकांना अगदी सहज मिळते, मात्र पोलिस प्रशासनाला याबाबत माहिती नाही, हे अशक्य वाटते.
पोलिस प्रशासनाचा अशिर्वाद?
स्थानिकांचा असा आरोप आहे की विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांना या अवैध धंद्यांबाबत सर्व माहिती असूनही त्यांनी डोळेझाक केली आहे. काहींच्या मते, पोलिस प्रशासनाच्या मूकसंमतीमुळेच हे धंदे निर्भयपणे सुरू आहेत.
तरुण पिढीचा विनाश
विश्रांतवाडी, येरवडा आणि आसपासच्या भागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर गांजाच्या विळख्यात अडकत आहे. या व्यसनामुळे तरुणांची विचार करण्याची शक्ती लयास जाते आणि ते गुन्हेगारी कृत्यांकडे वळतात. त्यामुळे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग आणि नार्कोटिक्स विभाग कारवाई करणार का?
विश्रांतवाडी परिसरातील मटका व्यवसायही मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. तरीही पोलिस प्रशासन कारवाई करण्यास उदासीन असल्याचे चित्र आहे. गांजा आणि अन्य अंमली पदार्थांच्या विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करून तरुण पिढीला या व्यसनमुक्तीच्या दिशेने नेण्याची जबाबदारी पोलिस आणि नार्कोटिक्स विभागावर आहे. नागरिकांना आता प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे.