तक्रारीनंतर अवघ्या दोन दिवसांत १५० विद्यार्थ्यांना पुस्तके; पालकांचा प्रशासनाला सवाल

0
IMG_20260904_172628

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुस्तके का मिळाली नाहीत? अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमधील पालकांकडून चौकशीची मागणी

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – पालकांनी शासकीय पाठ्यपुस्तके वेळेत न मिळाल्याबाबत प्रश्न उपस्थित करून संबंधित शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सुमारे १५० विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे, तक्रारीनंतर इतक्या कमी वेळेत पुस्तके उपलब्ध होऊ शकतात, तर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ती विद्यार्थ्यांना का मिळाली नाहीत, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील मोदीखाना कॅम्प परिसरातील अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झाली नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. याबाबत २ सप्टेंबर २०२६ रोजी पालक व विद्यार्थ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकांनी पुस्तकांच्या वितरणाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधितांकडे लेखी स्पष्टीकरणाची मागणी केली.

पालकांच्या म्हणण्यानुसार, बैठकीदरम्यान त्यांना सुमारे एक तास बाहेर बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली. पालकांचा दावा आहे की, तक्रारीनंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे ४ सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते बारावीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करण्यात आली.

पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे अनेक पालकांना बाहेरून पुस्तके खरेदी करावी लागली किंवा काही शैक्षणिक साहित्याची प्रिंट काढून घ्यावी लागल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागल्याचेही पालकांनी सांगितले.

या प्रकरणात पालकांनी आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. बहुजन समाजाच्या शाळांना शासकीय पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध करून देताना कोणते प्रशासकीय अडथळे येतात किंवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत आहे का, याची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा भेदभाव झाला असल्याचा ठोस आरोप करण्यात आलेला नसून, उपस्थित झालेल्या प्रश्नांची आकडेवारीसह स्पष्ट उत्तरे देण्याची मागणी पालकांनी केली आहे.

बालभारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळांसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची व्यवस्था करण्यात येते. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तकांच्या मागणीची नोंदणी केली जाते. त्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत का मिळाली नाहीत आणि त्यासाठी नेमकी जबाबदारी कोणाची, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

“तक्रार केली म्हणून पुस्तके मिळत असतील, तर तक्रारीपूर्वी पुस्तके का मिळाली नाहीत? विद्यार्थ्यांचे शिक्षण हा कोणाचा उपकार नसून त्यांचा हक्क आहे. या प्रकरणात चूक कोणाचीही असली तरी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” असे सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते इस्माईल आयाज शेख यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित मूलभूत सुविधांमध्ये विलंब होत असल्यास पालकांनी गप्प न बसता संबंधित शाळा आणि प्रशासनाकडे लेखी माहिती मागून योग्य पद्धतीने तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed