शहरात अनधिकृत फलकांवर महापालिकेची कठोर कारवाई; दोन महिन्यांत ३६ हजार फलक हटवले; नियमभंग करणाऱ्यांना दंड आणि गुन्हे दाखल

पुणे: शहरात अनधिकृत फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. आकाशचिन्ह व परवाना विभागाने ऑक्टोबर २०२४ पासून सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आतापर्यंत सुमारे ३६ हजार अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि किऑस्क हटविण्यात आले आहेत. या कारवाईतून महापालिकेने ४७ हजार रुपयांचा दंडही वसूल केला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली मोहीम १४ ते २१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान राबविण्यात आली, ज्यामध्ये २८ हजार अनधिकृत फलक हटविण्यात आले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर दुसरी मोहीम २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान पार पडली, यामध्ये आणखी ८ हजार अनधिकृत फलक हटविण्यात आले.
शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न
अनधिकृत फलकांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे तसेच शहराचे सौंदर्यही विद्रूप होत आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरण राखण्यासाठी महापालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने नुकतीच फलकधारक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत अनधिकृत फलकांविरोधात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांवरही चर्चा झाली.
“शहरातील विद्रुपीकरण थांबवून स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व संबंधित यंत्रणा सतर्क आहेत,” असे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठोंबरे यांनी सांगितले.
महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे शहरात स्वच्छता आणि नियमनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.