पुणे : कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा १ सप्टेंबर पासून

IMG-20240827-WA0033.jpg

पुणे: मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर आरक्षण आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन १ सप्टेंबरपासून करण्यात आले आहे, अशी माहिती इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि अखिल भारतीय आरक्षण कृती समितीच्या वतीने संयोजक असलम बागवान यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २७ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी इब्राहिम खान, नाझिया शेख, कमरुनिसा शेख, जावेद जहागिरदार, सचिन आल्हाट, अ‍ॅडव्होकेट त्रिवेणी रुपटक्के, हलिमा शेख उपस्थित होते.

ही पदयात्रा कोंढवा येथून १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असून, ती किल्ले शिवनेरी, संगमनेर, कोपरगाव, येवला, अमळनेर, चोपडा, फैजपूर मार्गे दिल्लीला पोहोचणार आहे. या पदयात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी राजघाट (नवी दिल्ली) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि ३ ऑक्टोबरला जंतर मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ही यात्रा ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात परत येणार आहे.

पहा व्हिडिओ

पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे:
1. आरक्षण म्हणजे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कमकुवत वर्गाला संधी उपलब्ध करून देणे होय. मात्र, आरक्षणाच्या मागण्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर होत असल्याचा आरोप आहे. संसदेत विधेयक आणून इंदिरा साहनी निर्णयानुसार आरक्षणावरील मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

2. अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचे विधेयक संसदेत आणण्याची मागणी.

3. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी कलम ३२/३ नुसार घटनादुरुस्ती करण्याची मागणी.

4. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी करावी.

5. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक निकषांवर आधारित जातीय जनगणना करावी.

6. भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळी अनधिकृत स्मारक समिती स्थापन करण्याच्या प्रकरणावर आक्षेप.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘सामाजिक न्याय पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नागरिकांनी यात सहभाग नोंदवून समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love