पुण्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत बोगस टोळ्यांचा उच्छाद; पालकांची फसवणूक सुरू; शिवसेनेची शिक्षण आयुक्तांकडे तक्रार

पुणे: आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक असल्याचा दावा शासनाने वारंवार केला असला, तरी या प्रक्रियेत फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. काही बोगस टोळ्या पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची माहिती पुढे आली आहे. “आरटीईमधून प्रवेश मिळवून देतो” असे सांगून या टोळ्या पालकांची दिशाभूल करत आहेत.
या टोळ्या शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी “सेटिंग” असल्याचा बनाव करत असल्याचे समजते. मागील वर्षी अशाच प्रकारे काही पालकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी व युवासेनेच्या प्रतिनिधींनी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली. “ही प्रवेश प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का? कुठल्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होतो का?” याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. तसेच या प्रक्रियेबाबत तात्काळ खुलासा करण्याची मागणी केली.
आयुक्तांनी यावर त्वरित कारवाईचे आदेश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना पत्रक जारी करण्यास सांगितले. “कोणी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देतो म्हणून पैशांची मागणी करत असेल, तर पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी केले आहे.
या बैठकीला शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर व युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे उपस्थित होते. पालकांनी फसवणूक टाळण्यासाठी सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद व्यक्तींना तात्काळ पोलिस किंवा स्थानिक पक्ष कार्यालयाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.