पुणे: येरवडा पुलावरील स्लॅबला पडला पुन्हा खड्डा; “तात्पुरत्या दुरुस्तीने धोका कायम, नागरिकांमध्ये संताप”; “सामाजिक कार्यकर्त्यांचे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना नाही”

पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरातील तारकेश्वर ब्रिजवर निर्माण झालेलं मोठं भगदाड नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते यांनी या भगदाडाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली नाही.
दि. ३ मे रोजी शनिवारी सकाळी गणेश घायमुक्ते यांनी लेखी तक्रार करूनही ना ट्रॅफिक पोलीस, ना कोणतेही शासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यामुळे वैतागून घायमुक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते शेट्टी यांनी स्वतः बॅरिकेट्स लावून वाहनचालकांसाठी तात्पुरती सुरक्षा व्यवस्था केली.
पहा व्हिडिओ

प्रकल्प विभागातील वीर सिंग यांनी हे भगदाड भरून काढले, परंतु नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे काम केवळ तात्पुरतेच वाटते. काही दिवसांतच पुन्हा भगदाड तयार होते, यावरून कामाची गुणवत्ता ही अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसते. ठेकेदारांना त्यांच्या बिलांची रक्कम दिली गेली असूनही काम अपुरं आणि धोकादायक स्वरूपाचं आहे.
सदर ब्रिजजवळ असलेले येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व अभियंते या ठिकाणी कधीच पाहणीसाठी आले नाहीत, ही बाब विशेष चिंतेची आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याऐवजी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे की, रस्ता काही काळ बंद करून योग्य पत्रव्यवहारानंतर दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा एखाद्या जीवितहानीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
—