पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचा बोजवारा; नागरिकांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन

0
PMC-Pune-Muncipal-Corporation.jpg

पुणे, २८ जून – मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांत नागरिकांच्या तक्रारी ऐकणारे कर्मचारीच नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. सकाळी लवकर तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन होत असून, अधिकारी-दरबारी गायब असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

‘कोणीच नाही तर तक्रार द्यायची कुणाकडे?’

नागरिक सांगतात की दुपारच्या सुमारासच अधिकारी कार्यालयात येतात, तोपर्यंत तक्रारी घेऊन आलेले नागरिक परत जातात. कुठे एखादा कर्मचारी दिसला, तरी तो “मी या कार्यालयातला नाही, दुसऱ्या वेळेस या” असे म्हणून पाठवून लावतो. परिणामी, नागरिकांचा संयम सुटू लागला असून संतप्त पुणेकर ‘कर्मचारी नसतील तर कार्यालयेच बंद करा’ अशी मागणी करू लागले आहेत.

बायोमेट्रिक यंत्रे बंद, हजेरीतही गोलमाल

महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असला, तरी सकाळी ९.४५ वाजता हजर राहण्याच्या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. बऱ्याच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचारी साडे दहानंतरच हजेरी लावतात. संध्याकाळी पाच वाजण्याआधीच कार्यालय ओस पडते.

गंभीर बाब म्हणजे, बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा असूनही ती बंद ठेवली जाते आणि मस्टरवर वरिष्ठांच्या मदतीने खोटी हजेरी लावली जाते. त्यामुळे ‘एकमेका साह्य करू’ म्हणत अधिकारी-कर्मचारी नागरिकांना वाऱ्यावर सोडत आहेत, अशी टीका होत आहे.

नागरी सुविधा केंद्रांचा अकार्यक्षम व्यवहार

पालिकेने सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रांमध्येही वेळेवर कर्मचारी न दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. मिळकतकर भरणे, दाखले मिळवणे, इत्यादी महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना ‘नेटवर्क नाही’, ‘कर्मचारी आलेले नाहीत’ अशी कारणे सांगून परत पाठवले जाते.

नागरिकांच्या तक्रारीचा सूर – ‘कधी नेटवर्क, कधी माणूस गायब’

> “मी मागील तीन दिवस कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात मिळकतकर भरण्यासाठी जात आहे. नागरी सुविधा केंद्रात कुणी नसते. ३० जून ही मुदत असूनही कर्मचारी अनुपस्थित. कधी नेटवर्क, कधी माणूस गायब – हेच उत्तर मिळते.”
— ज्येष्ठ नागरिक, कोथरूड



महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या प्रकारांमुळे महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास उरलेला नाही, अशी भावना अनेक नागरिकांमध्ये आहे. संगणकीकरण, नागरिकांना सुविधा, पारदर्शक प्रशासन यांचे गोडगाणे गाणाऱ्या पालिकेची जमीनीवरची स्थिती मात्र पूर्णपणे उलटी असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.

तळटीप: महापालिकेने या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यालयीन शिस्त, बायोमेट्रिक हजेरी आणि नागरी सेवा केंद्रांची कार्यक्षमता सुधारण्याची गरज आहे, अन्यथा नाराज पुणेकरांचा रोष वाढत जाईल.

Spread the love

Leave a Reply

You may have missed