पुणे: महापालिका आणि पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव: नागरीक हतबल”; “करोडो रुपयांचे सीसीटीव्ही ठप्प: पुणेकरांची सुरक्षा धोक्यात” माहितीच्या अधिकारातून धक्कादायक सत्य उघड

noida-cctv-camera-survilance.webp

पुणे: नागरीकांची सुरक्षितता अबाधित ठेवणे आणि वाहतूक व्यवस्थापन सुलभ करणे या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने शहरातील विविध बाजारपेठा, चौक, आणि सार्वजनिक ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या यंत्रणेमुळे पुणे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा ठप्प असल्याने नागरीकांच्या अपेक्षांवर पाणी फिरत आहे.

शिवाजीनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात बंद पडलेल्या कॅमेऱ्यांमुळे नागरिकांना आलेल्या अडचणींनी या समस्येचे गांभीर्य उघड केले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील मॉनिटरवर एकही कॅमेरा सुरू नसल्याचे जानेवारी २०२४ मध्ये आढळले. चौकशीदरम्यान पोलिसांनी सांगितले की, ऑगस्ट २०२३ मधील एका सरकारी कार्यक्रमावेळी कॅमेऱ्यांच्या केबल्स तुटल्या होत्या. त्यानंतर सहा महिने पाठपुरावा करूनही काही मोजके कॅमेरेच सुरू झाले.

मनुष्यबळाची कमतरता की दुर्लक्ष?
पोलिसांकडून कॅमेरांवर आवश्यक ती निगराणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय पुणे पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला याबाबत कोणताही लेखी पत्रव्यवहार केल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे अधिकृतरित्या सांगितले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणि समन्वयाचा अभाव समोर आला आहे.

करोडो रुपयांचा अपव्यय?
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी कोणताही ठोस उपाययोजना नाही. यंत्रणा चालू आहे का नाही, हे पाहण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाचे स्वतः लक्ष नसल्याने करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानीक लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांची भूमिकाही संशयास्पद
या कॅमेऱ्यांची संकल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडली असली तरी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. हे केवळ ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच उभारले जात आहेत का, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अनुत्तरीत
सुरक्षेसाठी उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे नागरीकांना फक्त त्यांच्या नशिबावरच विसंबून रहावे लागत आहे. यंत्रणा सुधारण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रुपेश राम केसेकर, पुणेकर नागरिक

Spread the love

You may have missed