व्हॅलेंटाईन डे स्पेशल: 482 लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाचे ‘विशेष प्रेम’! ३० बडे क्लास वन अधिकारी अजूनही खुर्चीत!

मुंबई: जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करताना एक दिवस प्रेमाचा असतो. मात्र, महाराष्ट्र शासनासाठी हे प्रेम वर्षभर चालते, तेही लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नुकतीच एका अहवालात धक्कादायक माहिती उघड केली आहे.
“दैनिक पोलीसनामा” ने दिलेल्या वृत्तानुसार, लाच घेताना पकडलेल्या तब्बल ४८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शासनाने अद्याप कारवाई केली नाही. यामध्ये १७३ जणांना निलंबितही करण्यात आलेले नाही. यातील ३० जण बडे क्लास वन अधिकारी असून, अजूनही आपल्या खुर्च्यांवर विराजमान आहेत.
शिक्षा झाल्यांनाही खुर्ची कायम!
सापळा कारवाईत पकडले गेलेल्या २२ जणांना शिक्षा झाल्यापासूनही अद्याप बडतर्फ केले गेलेले नाही. विशेष म्हणजे, एका अधिकाऱ्याला २०१२ मध्ये शिक्षा होऊनही अजूनही तो सेवेत आहे.
‘प्रेमात’ आघाडीवर शिक्षण आणि क्रीडा खाते
शिक्षण आणि क्रीडा खात्याने लाचखोरीसाठी अडकलेल्या ४१ जणांना अद्याप सेवेत कायम ठेवले आहे. नगरविकास खात्यात ३६ तर पोलीस विभागात २५ जणांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेचीही कारवाई रखडली
लाचलुचपत विभागाने १४ प्रकरणांमध्ये १५.३ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती प्रकरणे अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
खटला दाखल करण्यास परवानगीही रखडलेली
लाचखोरांविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीसाठी ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी प्रलंबित असलेली ४०२ प्रकरणे आहेत. यामध्ये ११५ प्रकरणे शासनाकडे आणि २८७ प्रकरणे सक्षम अधिकार्यांकडे अडकलेली आहेत.
मग, हे ‘विशेष प्रेम’ नाही तर काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या अहवालावरून शासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न होणे म्हणजे शासनाचे या भ्रष्टाचार्यांवर ‘विशेष प्रेम’च असल्याची टीका होत आहे.