पुणे: खराडीत भाडेकरूकडून तीन लाखांची वसुली? पोलीस, घरमालक आणि ‘सामाजिक कार्यकर्त्या’वर गंभीर आरोप

0
IMG_20251117_115040.jpg

पुणे : खराडी परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या आडून सुरू असलेल्या ‘वसुली रॅकेट’चे नवे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. घर रिकामे करण्यासाठी थेट तीन लाखांची मागणी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंद घराचे दार तोडून केलेला बेकायदा प्रवेश… यामुळे खराडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

भाडेकरूकडून घर रिकामे करण्यासाठी तीन लाख?
फिर्यादी गौरी शिवशंकर लखानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरमालक राजकुमार बन्सल (६४) आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या प्रभा करपे (४८) यांनी मिळून भाडेकरूकडून तब्बल तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे—ही वसुली एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या मध्यस्थीने केली गेल्याचे समोर आले आहे.

दार तोडून बेकायदा प्रवेश—तेही पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत!
३१ ऑक्टोबर रोजी बन्सल–करपे यांनी सहायक निरीक्षक मुबारक शेख यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ‘बंद घरात प्रवेश करा’ असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.
१ नोव्हेंबरला तिघांनी मिळून गेरा पार्क व्हिव सोसायटीत सदनिकेचे दार तोडत थेट घरात घुसखोरी केली. या प्रकरणाची तक्रार होताच खराडी पोलिसांनी बन्सल आणि करपे यांच्यावर बेकायदा प्रवेशाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनंतर उघड झाला ‘वसुली व्यवहार’?
गुन्हा दाखल झाल्यानंतर बन्सल यांनी थेट पोलिस उपायुक्त मुंडे यांची भेट घेतली आणि तब्बल तीन लाख रुपये करपे यांना दिल्याची कबुली दिली. चौकशीत सहायक निरीक्षक शेख यांनीच घरात प्रवेश करण्यास मदत केल्याचे समोर आले.

पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची छाया
या प्रकरणाला गांभीर्याने घेत उपायुक्त मुंडे यांनी

  • वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण,
  • गुन्हे निरीक्षक विश्वजित जगताप,
  • सहायक निरीक्षक मुबारक शेख

यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सविस्तर चौकशीचे आदेश दिले.

“पोलिसांचा यात संबंध नाही” – वरिष्ठ निरीक्षकांची बचावाची भूमिका
संजय चव्हाण यांनी म्हटले की—
सदनिकेतील साहित्य बन्सल आणि करपे यांनी स्वतःच बाहेर काढले. करपे या पोलिस ठाण्यात नागरिकांची कामे घेवून येत असल्याने त्यांची पोलिसांशी ओळख आहे; परंतु पोलिसांचा थेट सहभाग नाही. तीन लाखांच्या व्यवहाराचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असा दावा त्यांनी केला.

मात्र घटनास्थळी सहायक निरीक्षक उपस्थित होते, दार तोडण्याचे निर्देश पोलिसांकडून दिल्याचे आरोप आहेत आणि त्यानंतरची आर्थिक देवाणघेवाणही कबुल. त्यामुळे पोलिसांच्या ‘मध्यस्थी’ची शंका अधिकच गडद होत आहे.


खराडीतील हे प्रकरण पोलिस–सामाजिक कार्यकर्त्या–घरमालक या त्रिकोणातील संशयास्पद जाळ्याचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.
भाडेकरूंची अडचण, नागरिकांच्या हक्कांचे रक्षण—हे सर्व फोल ठरवत, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घर फोडून वसुली करण्याची घटना उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed