पुणे : वाघोलीतील ‘मोझे कॉलेज’ मध्ये शिक्षण क्षेत्राला काळिमा; उत्तरपत्रिका फेरलिखाण प्रकरण उघडकीसविद्यापीठाची चौकशी, १० वर्षे परीक्षा केंद्र बंद ठेवण्याची शिफारस;

पुणे प्रतिनिधी |वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या गंभीर परीक्षा गैरप्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांकडून रात्रीच्या वेळी पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तात्काळ दखल घेत, महाविद्यालयावर कठोर कारवाईची शिफारस केली आहे.
परीक्षेनंतर स्ट्रॉंगरूममधून उत्तरपत्रिका बाहेर
विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका परीक्षा संपल्यानंतर स्ट्रॉंगरूममधून बाहेर काढण्यात आल्या आणि त्या विद्यार्थ्यांना परत देऊन फेरलेखनास भाग पाडले गेले, असा आरोप आहे. हा प्रकार प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी घडवून आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
विद्यापीठाची तात्काळ चौकशी
या प्रकाराची माहिती मिळताच पुणे विद्यापीठाने सत्यशोधन समितीची नियुक्ती केली. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुनील ठाकरे, डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा समावेश होता. समितीने कॉलेजला भेट देऊन सखोल चौकशी केली व सविस्तर अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्त केला.
अहवालातील शिफारशी
सत्यशोधन अहवालात महाविद्यालयाविरोधात खालील कडक उपाययोजना सुचवण्यात आल्या:
कॉलेजचे परीक्षा केंद्र १० वर्षांसाठी बंद ठेवावे
संस्थेला ३ लाख रुपयांचा आर्थिक दंड आकारावा
संबंधित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३ वर्षांसाठी परीक्षा कामांपासून वंचित ठेवावे
हा अहवाल विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर सादर करण्यात येणार असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.
शिक्षण व्यवस्थेतील दुरुस्ती गरजेची
या प्रकरणामुळे केवळ परीक्षा प्रक्रियेतील त्रुटीच नव्हे तर महाविद्यालयामधील प्रशासनातील दुर्लक्षही स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाने पूर्णवेळ प्राचार्य व पात्र प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य प्रशासकीय आणि शैक्षणिक व्यवस्था असणे आवश्यक आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.
—
विद्यापीठाचा पुढील निर्णय केवळ या महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता, इतर खासगी संस्थांसाठीही एक ‘सिग्नल’ ठरेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रक्रिया राबवणे काळाची गरज बनली आहे.