महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई केवळ कागदावरच? रोजचाच खेळ: कारवाई होते, अतिक्रमण परत येते!

पुणे प्रतिनिधी : येरवडा, कळस, धानोरीत, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून विविध भागात कारवाई सुरू आहे. मात्र ही कारवाई केवळ लहान पथारीधारकांवर आणि स्टॉलधारकांवर केंद्रित असल्याने मोठ्या व्यावसायिक आणि अनधिकृत चौपाट्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महापालिकेने अतिक्रमण हटवून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे केले असले, तरी काही तासांतच पुन्हा तिथे अतिक्रमण उभे राहत आहे. परिणामी, कारवाई केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित असल्याचे चित्र आहे.
थोड्या वेळातच ‘जैसे थे’ स्थिती
येरवडा, कळस, धानोरीत, नगर रस्ता, खराडी, विमाननगर आदी भागांत केलेली कारवाई काही वेळासाठीच प्रभावी ठरली. महापालिकेचे पथक निघून गेल्यावर लगेचच व्यावसायिक पुन्हा पथारी थाटत असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे कारवाईचे उद्दिष्ट फसलेले दिसते.
‘टीप’ मिळताच अतिक्रमण हटते!
महापालिकेचे पथक येण्याआधीच अनेक पथारीधारक आपले साहित्य हटवतात. यामागे पथकातीलच काही कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या ‘टीप’ची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कारवाईचा परिणाम शून्यावर येतो.
बदल्या असूनही कारवाईत सुधारणा नाही
महापालिका आयुक्तांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अतिक्रमण निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बदल्या केल्या गेल्या, तरीही कारवाईत अपेक्षित तीव्रता दिसून येत नाही. निरीक्षकांचे अनधिकृत व्यावसायिकांशी असलेले संबंध हीच कारवाईतील अडथळा ठरत आहेत.
गॅस सिलिंडर वापरूनही कारवाई नाही
परवानगीच्या अटींनुसार पथारीवर अन्न शिजविण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी खुलेआम गॅस सिलिंडर वापरले जात आहेत. महापालिकेकडून सिलिंडर जप्त करण्यात येत असले, तरी संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही.
मनुष्यबळाचा अभाव, ३२ गावांत अतिक्रमण वाढतेय
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्येही अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ अपुरे असल्याने अनेक भागांकडे दुर्लक्ष होते आहे.
महापालिकेचा दावा : मोठ्यांवरही कारवाई सुरूच
“महापालिकेने अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवली असून, केवळ लहान नव्हे तर मोठ्या व्यावसायिकांवर आणि चौपाट्यांवरही कारवाई केली जात आहे,” असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी स्पष्ट केले.
पुणेकरांच्या प्रश्नांना आणि अडचणींना वाचा फोडणारी ही अतिक्रमण कारवाईची लढाई केव्हा प्रभावी ठरेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.