भोसरीतील महापालिकेच्या नवीन रुग्णालयातील अतिदक्षता विभाग ठप्प; गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयाची शिफारस

पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील नवीन सुसज्ज रुग्णालयातील ८ खाटांचे अतिदक्षता विभाग (ICU) अस्तित्वात असतानाही, गंभीर व अस्वस्थ रुग्णांना दाखल करून न घेता त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भाजप शहर सरचिटणीस सचिन काळभोर यांनी याबाबत तक्रार महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
रुग्णांची गैरसोय, जीव धोक्यात
रुग्णालयात ICU असतानाही गंभीर रुग्णांना तिथे दाखल करून घेतले जात नाही. परिणामी, वेळ वाया जातो आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी रुग्णालयांचा शोध घेत फिरावं लागल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचीही मोठी गैरसोय होते, अशी माहिती काळभोर यांनी दिली.
कोट्यवधींचा खर्च, तरीही सेवा ठप्प
महापालिकेने भोसरीत नवीन रुग्णालय उभारताना कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. ICU विभागासाठी अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांना लाखो रुपयांच्या वेतनावर नेमणूक देण्यात आली आहे. तरीही, रुग्णांना दाखल न करता त्यांना खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयांशी आर्थिक हितसंबंध?
रुग्ण दाखल करून न घेतल्याच्या प्रकारामुळे डॉक्टरांचे खाजगी रुग्णालयांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेवरही टीका होत आहे.
वायसीएममध्ये कायम वेटिंग, तरीही भोसरीत जागा रिकामी
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयांतील ICU विभाग कायम भरलेले असतात. तेथे रुग्णांना दाखल करण्यासाठी वेटिंग असते. मात्र, भोसरीतील नवीन ICU विभागात जागा उपलब्ध असूनही रुग्ण नाकारले जात असल्याने या निर्णयाविरोधात आवाज उठू लागला आहे.
ठळक मुद्दे :
भोसरीच्या नवीन ICU विभागात रुग्णांना दाखल न करण्याचा आरोप
ICU असूनही सेवा ठप्प, रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जाते
डॉक्टरांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय
भाजपने दिला चौकशीचा इशारा आणि आंदोलनाचा इशारा
संपादक के टिपणी: “महापालिकेच्या खर्चावर उभारलेले ICU जर सामान्य जनतेसाठी बंदच ठेवायचे असतील, तर त्या सेवेचा उपयोग काय? दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.