मराठी बोलण्यावरून अरेरावी; टपाल कर्मचाऱ्याची बदली

मुंबई : वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित टपाल तिकीट प्रदर्शनात मराठी भाषेचा वापर केल्यावरून वाद निर्माण झाला होता. डोंबिवली येथील ज्येष्ठ तिकीट संग्राहक रमेश पारखे (८२) हे नेहमीप्रमाणे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेले होते. तिकीट खरेदी करताना ३२ क्रमांकाच्या तिकीट खिडकीवरील हिंदी भाषक कर्मचाऱ्याने पारखे यांना “हिंदीत बोला” असे सांगत, अरेरावीची भाषा केली होती.
याबाबत रमेश पारखे यांनी टपाल विभागाच्या संचालकांना तक्रार केली. यानंतर ‘लोकसत्ता’ने ५ फेब्रुवारीला ही घटना प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत दिवा येथील मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी दिल्लीच्या टपाल महानिदेशकांकडे तक्रार दाखल केली. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार मराठी भाषेचा वापर बंधनकारक असल्याचे आणि कोणत्याही भाषेची सक्ती करता येणार नाही, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
तक्रारीनंतर दिल्लीतील टपाल विभागाने चौकशीचे आदेश दिले. चौकशीत हा प्रकार कर्मचाऱ्याच्या भाषिक अडचणीमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. गैरवर्तनाच्या आरोपांचे खंडन झाले असले तरी, टपाल साहाय्यक कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती टपाल विभागाचे उपनिदेशक राजन बुचडे यांनी आनंदा पाटील यांना दिली.
संबंधित प्रकरणावर टपाल विभागाने गंभीरपणे विचार करून विषय मिटवला असल्याची माहिती दिली आहे.