विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आता एकदाच उत्पन्न दाखला, अभ्यासक्रमभर शिष्यवृत्ती मिळणार

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला व कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच माहिती अपलोड केली की ती संपूर्ण अभ्यासक्रमभर ग्राह्य धरली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वेळेत जमा होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. CET सेल व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी एकदाच उत्पन्न दाखला व इतर कागदपत्रे सादर करतात. त्यामुळे पुन्हा तीच माहिती मागवू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुलभता:
महाडीबीटी पोर्टलवर एकदाच कागदपत्रे अपलोड करावी लागणार.
वारंवार तीच माहिती सादर करण्याची आवश्यकता नाही.
विद्यापीठांनाही पुन्हा कागदपत्रे तपासावी लागणार नाहीत.
वेळेची बचत होऊन शिष्यवृत्ती लवकर मिळणार.
बैठकीत अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या हिस्स्याची 60% रक्कम वेळेत जमा व्हावी, यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्यवृत्ती वितरण राज्याच्या वेतन प्रणालीच्या धर्तीवर ‘ऑटो सिस्टीम’द्वारे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळेल आणि कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी होईल.
—