पुणे: वाहतुकीचे नियमन की ‘लक्ष्मी’ दर्शन? पुणेकरांचा सवाल; वाहतूक सुधारण्याऐवजी दंड वसुलीवर भर,

पुणे: शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुरू असलेल्या टोईंग कारवाईत पोलिसांची अरेरावी आणि भ्रष्टाचाराने नागरिकांना हैराण केले आहे. वाहतूक पोलिस आणि टोईंग कर्मचारी उद्धट वर्तन करत नागरिकांकडून दंड वसुलीत व्यस्त असून, सामान्य वाहनचालकांचा संताप वाढला आहे.
नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करताना टोईंग कर्मचारी आक्रमक भाषेत बोलत पावती भरायला भाग पाडतात, असा आरोप अनेक वाहनचालकांनी केला आहे. शिवाय, कारवाईदरम्यान टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांशी वाद होत असून, काही ठिकाणी तोडपाणीसाठीही दबाव टाकला जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
नो-पार्किंग दंडाचे आकडे चकित करणारे
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांकडून नो-पार्किंग दंडाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांत तब्बल १४ कोटी ७२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. नियम मोडल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाते. दुचाकी चालवणाऱ्यांसाठी पहिल्या वेळी ७८५ रुपये, तर दुसऱ्यांदा १७०० रुपये दंड आकारला जातो. चारचाकी वाहनांसाठी पहिल्या वेळेला १०७१ रुपये, तर दुसऱ्यांदा २०७१ रुपये आकारले जातात.
टोईंग कारवाईसाठी नागरिकांवर अधिक आर्थिक भार
वाहतुकीच्या अडथळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ३० टोईंग व्हॅनद्वारे कारवाई केली जाते. यात १० व्हॅन चारचाकींसाठी तर २० व्हॅन दुचाकींसाठी आहेत. परंतु, या टोईंग व्हॅनचे भाडेही वाहनचालकांकडून वसूल केले जाते, ज्यामुळे सामान्य नागरिकांवर अधिक आर्थिक भार येतो.
नागरिकांचा संताप उफाळला
वाहनचालकांच्या मते, रस्त्यावर काही वेळासाठी वाहन उभे करून औषध आणायला जाणाऱ्या किंवा तातडीच्या कामासाठी गाडी थांबवणाऱ्यांवर कारवाई होते, तर हॉटेल व्यावसायिक, कुरिअरवाल्यांची वाहने मात्र दुर्लक्षित केली जातात. “टोईंग करताना वाहनांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो, पण पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत,” असे ज्ञानेश्वरी पवार, लॉ स्टुडंट यांनी सांगितले.
ठोस उपाययोजना करण्याची मागणी
वाहनचालकांवरील अन्यायकारक कारवाई रोखण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. “टोईंग कर्मचारी उद्धट वागतात, पोलिसांनी त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवावे,” असे अॅड. मंगेश जाधव यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी केवळ दंड वसुलीवर भर न देता वाहतूक सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी सामान्य पुणेकरांकडून होत आहे.