गांजाच्या विळख्यात पिंपरी-चिंचवड; दररोज पोलिसांची कारवाई, तरीही तरुण व्यसनाच्या आहारी

0
p-ganja_202106638754.jpg

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून दररोज कारवाई होत असली तरी गांजाच्या खुलेआम विक्रीचे जाळे अद्याप उद्ध्वस्त झालेले नाही. परिणामी, शहरात गांजाची सहज उपलब्धता असल्याने महाविद्यालयीन वयातील तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

शहरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये राज्याच्या विविध भागांतील व परराज्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या हजारो युवकांचा वावर आहे. या तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवणे हे पोलीस व नागरी प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. झोपडपट्ट्या, चौक, वस्ती आणि दुकानांत खुलेआम गांजा व इतर अमली पदार्थ विकले जात असून, पोलीस कारवाया केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शहर गुन्हेगारी आणि व्यसनमुक्त करण्यासाठी कठोर व सातत्यपूर्ण कारवाई अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या ४८ तासांत पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना अटक केली असली, तरी या आरोपींपर्यंत गांजा पोहोचतो तरी कुठून? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

गांजा जप्तीच्या सलग कारवाया

चाकण – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नानेकरवाडी येथे बुधवार, २८ मे रोजी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत आकाश सिंह अजय प्रताप सिंह ठाकूर (२६, रा. निघोजे, खेड) या तरुणाकडून तब्बल १ किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी ६०,५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दिघी – दिघी पोलिसांनी इंद्रायणी नगर येथे स्वामी भागवत माने (२३, रा. आळंदी) या युवकाकडून २५९ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत त्याला ताब्यात घेण्यात आले. जप्त गांजाची किंमत १२,९५० रुपये इतकी आहे.

डुडुळगाव – डुडुळगाव परिसरातही दिघी पोलिसांनी गणेश नागेश लोणडे (२३, रा. चाकण) या तरुणाला ८७७ ग्रॅम गांजासह अटक केली आहे. या गांजाची बाजारभावानुसार किंमत ४३,८५० रुपये आहे.


सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष?

गांजा व इतर तंबाखूजन्य पदार्थ खुलेआम विक्रीसाठी उपलब्ध असून पानमसाल्याच्या आडून अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांकडून या बाबीकडे होत असलेले दुर्लक्ष चिंता वाढवत आहे.

शहरातील तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अमली पदार्थांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी ठोस आणि तीव्र उपाययोजना करणे हे वेळेचे महत्व ओळखून त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

You may have missed