पालखी सोहळा 2025 : पुणे जिल्ह्यात २२ जूनपासून वाहतुकीत मोठे बदल; जिल्हा प्रशासनाचा निर्णय; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन

पुणे : येत्या २२ जून २०२५ पासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यासंदर्भात आदेश काढून परिवहन यंत्रणा आणि नागरिकांना सूचित केले आहे.
पालखी मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी, तसेच कोणतीही कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्धपणे काही मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान मार्ग बंद राहतील, तसेच पर्यायी मार्गांची माहितीही देण्यात आली आहे.
—
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – वाहतूक बदल
२२ जून: पुणे ते सासवड मार्ग बंद. दिवेघाट, बोपदेव घाट मार्ग बंद राहणार. पर्यायी मार्ग: खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ.
२४-२५ जून: सासवड-जेजुरी-वाल्हे मार्ग बंद. नीऱ्याकडून येणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव मार्गे.
२६ जून: लोणंद मुक्काम. सकाळी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत बंद. वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळवली जाईल.
२६-२८ जून: लोणंद ते फलटण. दोन्ही बाजूंची वाहतूक शिरवळमार्गे वळवली जाईल.
—
तुकाराम महाराज पालखी सोहळा – वाहतूक बदल
२३ जून: लोणी काळभोर ते यवत. दोन्ही बाजूंची वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव मार्गे वळवली.
२४ जून: यवत ते वरवंड. पुणे-सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-दौंड-कुरकुंभ मार्गे.
२५ जून: वरवंड ते उंडवडी. बारामती-पाटस व बारामती-दौंड मार्ग बंद. वाहतूक भिगवण मार्गे वळवली जाईल.
२६ जून: उंडवडी ते बारामती. बंद रस्ते पूर्वीप्रमाणेच; पर्यायी मार्ग भिगवणकडून.
२७ जून: सणसर मुक्काम. जंक्शन ते बारामती मार्ग बंद. वाहतूक कळसमार्गे वळवली.
२८ जून: सणसर ते अंथुर्णे. इंदापूर-बारामती मार्ग बंद. कळंब/भिगवण मार्गे पर्यायी वाहतूक.
२९ जून: अंथुर्णे ते इंदापूर. वाहतूक बंद; लोणी देवकर मार्गे पर्यायी व्यवस्था.
३० जून: अकलूज ते बारामती मार्ग बंद. अकलूज-बावडा-नातेपूते मार्गे वाहतूक वळवली.
१ जुलै: इंदापूर ते सराटी. १ व ३ जुलैला इंदापूर-अकलूज रोड बंद. पर्यायी मार्ग: हिंगणगाव-टेंभुर्णी-माळीनगर.
—
सहकार्याची अपेक्षा
या बदलांमुळे सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना काही अडथळे येण्याची शक्यता आहे. मात्र, पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. योग्य सूचना फलक, वाहतूक नियंत्रण आणि पर्यायी मार्गांच्या व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.