वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष; सोलापूरमध्ये अपघातांची शक्यता वाढली; शहरातील वाहतूक समस्या गंभीर

सोलापूर : सोलापूर शहरातील आसरा चौक, जुना बोरामणी नाका, शांती चौक, रंगभवन चौक, सिव्हिल चौक आणि गांधी नगर या प्रमुख चौकांमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. या चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. वाहतूक नियमनासाठी सिग्नल बसवण्यात आले असले, तरी वाहतूक शिस्त पाळली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
झेब्रा क्रॉसिंगचा नियम मोडला जातोय
सिग्नलजवळ झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवण्याचे प्रकार वाढले असून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या चौकांमध्ये वाहतूक अंमलदार असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहने उभी करतात, ज्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडथळे निर्माण होतात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा नियम असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
१२ तास सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
सोलापूर शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सिग्नल सलग सुरू ठेवले जात आहेत. उन्हाचा पारा ३६ अंशांपर्यंत पोहोचला असतानाही या वेळेत कोणतीही बदल करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनधारक सिग्नल मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सिग्नलजवळ वाहने अस्ताव्यस्त थांबल्याने वाहतूक अधिकच कोंडी होत आहे.
महापालिकेकडे मागण्यांची दखल नाही
सिव्हिल चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सततची वर्दळ असते. मात्र, रुग्णालयाजवळील रोड अरुंद असून दुभाजकावर अतिक्रमण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे सिग्नलची उंची वाढविणे, बंद सिग्नल दुरुस्त करणे आणि अरुंद चौक रुंद करणे या मागण्या केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
उपाययोजना आवश्यक
वाहतूक अंमलदारांनी झेब्रा क्रॉसिंगवरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. अरुंद चौकांमधून जड वाहनांना प्रवेशबंदी असावी. तसेच, सिग्नलची उंची वाढवून वाहनचालकांना स्पष्ट संकेत मिळावेत आणि रुग्णालयाजवळील रस्ते काहीसे रुंद करून अपघातांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.
सुधारणा होणार – सुधीर खिरडकर, सहायक पोलीस आयुक्त
“शहरातील अरुंद चौकांची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. काही दिवसांत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे,” असे सुधीर खिरडकर यांनी सांगितले.