येरवड्यात गटाराचा कहर; जय जवान नगर जलमय; महापालिकेचे तात्पुरते जुगाड अपयशी; दोन महिने झाला तरी कायमस्वरूपी उपाय नाही – व्हिडिओ

पुणे (येरवडा): जय जवान नगरमधील अमृतेश्वर गणेश चौक परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून दररोज सकाळीपासून दुपारीपर्यंत गटाराचे घाण पाणी गुडघ्यापर्यंत साचत असून संपूर्ण भाग दुर्गंधीने ग्रासला आहे. गटाराच्या झाकणातून दाबाने बाहेर येणारे हे पाणी आता घरांमध्ये, दुकानदारांच्या दुकानांमध्ये आणि परिसरातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री अमृतेश्वर गणेश मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.
गणेश मंदिराचा परिसर जलमय, भक्त त्रस्त
मंदिराच्या तीनही बाजूंनी गटाराचे पाणी भरून राहिल्याने भक्तांना मंदिरात प्रवेश करणे अशक्य झाले आहे. कोणत्याही वेळी पावसाचा जोर वाढला, तर हा संपूर्ण परिसर एखाद्या तळ्यासारखा दिसतो. सकाळी साडेसहाच्या सुमारास गटरचे झाकण उघडते आणि काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता जलमय होतो.
पहा व्हिडिओ
नागरिकांचे जीवन होत आहे नारकीय
या भागातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच जावे लागते. दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडतात. महिला, वृद्ध, लहान मुले यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकांना त्वचा विकार, ताप, संसर्गजन्य आजार होत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष, तात्पुरते उपाय अपुरे
नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असून महापालिकेचे कर्मचारी काही वेळेस हजेरी लावतात, परंतु केलेले उपाय हे फक्त तात्पुरते असतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती उद्भवते. त्यामुळे स्थानिकांनी या दररोजच्या संकटाला ‘नित्य जलप्रलय’ असे नाव दिले आहे.
जनप्रतिनिधी गायब, प्रशासकीय राजवटीत कोणी विचारणारे नाही
गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिकेत कोणताही निवडून आलेला प्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. प्रशासक राजवटीमुळे जबाबदारीचे भान कुणालाच नाही. परिणामी, नागरिकांची व्यथा ही ‘नक्कारखान्यात तूतीचा आवाज’ ठरली आहे.
आरोग्याचा गंभीर धोका – महामारीची शक्यता
गटार पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, त्वचा रोग यांचे रुग्ण वाढत आहेत. लवकर ठोस उपाययोजना न केल्यास या भागातून महामारी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानीय नागरिकांची ठाम मागणी:
- संपूर्ण गटार लाईनचे नव्याने आणि शास्त्रशुद्ध पुनर्निर्माण करावे.
- जलनिकासीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- आरोग्य विभागाने तत्काळ वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करावे.
- नियमित स्वच्छता आणि देखरेख यांची पक्की व्यवस्था करावी.
- सार्वजनिक शौचालयांची स्थिती अत्यंत वाईट असून ती स्वच्छ करून दुरुस्त करावी.