पुण्यात कुत्र्यांचा दहशतवाद, प्रशासनाची कारवाई केवळ कागदावर; सुरक्षेचा हक्क कुत्र्यांचा की माणसांचा? दिपाली सरदेशमुख

पुण्यात आक्रमक भटक्या कुत्र्यांचा त्रास शिगेला; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक बदलांची मागणी
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात आक्रमक भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना गंभीर जखमा झाल्याचे समोर आले असून, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पुणे जनतंत्र संस्थेच्या सौ. दिपाली सरदेशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य मंत्री, बाल हक्क आयोग, तसेच पुणे महापालिका यांच्याकडे निवेदन देत तातडीने धोरणात्मक बदल करून कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

लहान मुलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले
सोसायटीच्या आवारात खेळणारी लहान मुले, सकाळी फिरणारे नागरिक, वृद्ध व्यक्ती – हे सर्व भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत. अशा घटनांमुळे नागरिक सतत दहशतीखाली जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे, कुत्र्यांच्या लसीकरण व पकड मोहीमा केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासनाची निष्क्रियता, लसींचाही तुटवडा
प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी निधी जाहीर करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात मदतीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच, अनेक रुग्णालयांमध्ये रेबीजच्या लसी अनुपलब्ध असल्याने जखमींना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
एबीसी नियमांवर प्रश्नचिन्ह
एबीसी (Animal Birth Control) 2023 चे काही नियम हे सहकारी गृहनिर्माण संस्था, लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आक्रमण करत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, हे नियम स्थानिक पातळीवर फेरविचारात घ्यावेत व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी धोरणे तयार करावीत, अशी मागणी झाली आहे.
कायदा केवळ कागदापुरता?
प्रशासन, पोलीस, आणि आयोग केवळ मोठ्या व्यक्तींवर हल्ला झाल्यास तातडीने कारवाई करतात, सामान्य नागरिकांच्या बाबतीत मात्र तक्रारी दाबल्या जातात, असा गंभीर आरोप निवेदनात केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना त्यांच्या स्वसंरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याची भावना वाढीस लागली आहे.
तातडीच्या उपाययोजना आवश्यक
सार्वजनिक रस्ते, फूड कोर्ट, हॉटेल परिसर, बाजारपेठा अशा सर्वच ठिकाणी आक्रमक कुत्रे मुक्तपणे फिरताना दिसतात. रात्रीच्या वेळी तर हे कुत्रे गटांमध्ये फिरून नागरिकांवर हल्ले करतात. त्यामुळे, ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. स्थानिक व राज्य प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून धोरणात्मक पातळीवर प्रभावी उपाय करावेत, अशी जनतेची जोरदार मागणी आहे.
नागरिकांची सहवेदना — “प्राण्यांप्रती प्रेम असावे, पण मानवांचं जीवनही तितकंच मौल्यवान! “प्राणीमित्र संघटनांनी जशी भटक्या कुत्र्यांची काळजी घेतली जाते, तशीच नागरिक व विशेषतः लहान मुलांचीही जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
– — –