मोठी बातमी! विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार ‘आरटीई’ प्रवेश; शालेय शिक्षणचा नवा आदेश; शुक्रवारपासून नव्याने करावे लागणार अर्ज

1715574963917761-0.jpg

सोलापूर : ‘आरटीई’ प्रवेशाच्या नियमातील दुरूस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत.

येत्या शुक्रवारपासून नव्या आदेशानुसार पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आर्थिक व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर किमान २५ टक्के प्रवेश भरण्याची पद्धत) नियम २०१३मध्ये तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मध्ये ९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात आली. पण, काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने शासनाने पुन्हा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित आदेशानुसार ‘आरटीई’ प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षण खात्याने ‘एनआयसी’ला तशा सूचना केल्या असून त्यासाठी किमान तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे नवीन आदेशानुसार शुक्रवारपासून (ता. १७) ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणे आता पालकांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळा निवडता येणार आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जाणार आहे.

सर्वांनाच नव्याने अर्ज करावे लागणार
शासनाने ‘आरटीई’च्या नियमात बदल केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील दोन लाख ११ हजार पालकांनी अर्ज केले होते. त्यातील जवळपास ६८ हजार पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले होते. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील २५ टक्के जागा रिक्त ठेवून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. पण, आता शासनाने पुन्हा नियमात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच पालकांना आपल्या पाल्यांसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.

नवीन आदेश निघाल्यावर पालकांना करावे लागणार नवे अर्ज
‘आरटीई’ प्रवेशाच्या नियमात आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता पूर्वीप्रमाणेच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. त्यासंदर्भातील नवे आदेश निघाल्यानंतर पालकांनी पोर्टलवर अर्ज करायचे आहेत.
– शरद गोसावी, संचालक, शालेय शिक्षण
Link source: sakal

Spread the love

You may have missed