पुणे: महिला पत्रकार विनयभंग प्रकरण: ढोल-ताशा पथकातील आरोपींचा जामीन फेटाळला

0
IMG_20250913_121105.jpg

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक झालेल्या ढोल-ताशा पथकातील दोन सदस्यांचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. या आरोपींविरोधात गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, जामीन दिल्यास ते तक्रारदार व साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी दिलेल्या आदेशात, पीडितेला संरक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे.

अनोज बबन नवगिरे (३४, रा. मंगळवार पेठ) आणि चिराग नरेश किराड (२४, रा. लाल देऊळ सोसायटी) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही त्रिताल ढोल-ताशा पथकाचे सदस्य असून, त्यांच्याविरोधात विनयभंग, लैंगिक छळवणूक यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील
सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी बुधवार चौकात ही धक्कादायक घटना घडली. वीस वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला पत्रकाराला आरोपींनी ढकलून तिचा विनयभंग केला, तसेच तिच्या मित्रावरही हल्ला केला. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

न्यायालयीन प्रक्रिया
या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सरकारी वकील अमर ननावरे यांनी याला तीव्र विरोध करत, “आरोपींना जामीन मिळाल्यास ते तक्रारदार व साक्षीदारांना धमकावू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये,” असा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

या आदेशामुळे पीडितेला तातडीचे संरक्षण मिळाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.



Spread the love

Leave a Reply