१ हजार ४९ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे परवाने रद्द; तीन महिने लॉगिन न करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

पुणे : जिल्ह्यातील १ हजार ०४९ ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांकडून तीन-तीन महिने लॉगिन न केल्याने आणि नागरिकांना सेवा न दिल्याने जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यामुळे केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या २ हजार ५७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे कार्यरत असून, त्यातील केवळ १ हजार ५२४ केंद्रे सुरळीतपणे कार्यरत असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळले आहे. उर्वरित केंद्रांमध्ये कामकाजात अनियमितता, नागरिकांना सेवा न देणे, विहित वेळेत दाखले न मिळणे, तसेच अवाजवी शुल्क आकारण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
ग्रामपंचायतींमध्ये नवीन केंद्रे सुरू होणार
रद्द करण्यात आलेल्या केंद्रांच्या ठिकाणी नव्याने केंद्र उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी, यासाठी १ हजार ३८७ ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव राज्यस्तरावर पाठविण्यात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोतही उपलब्ध होणार आहे.
सेवा नियमित ठेवण्याचा स्पष्ट आदेश
‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू करताना केंद्रचालकांना नियमितपणे आपले लॉगिन सक्रिय ठेवून नागरिकांना सेवा देण्याची जबाबदारी दिली जाते. त्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र लॉगिन आयडी देण्यात आला आहे. याच माध्यमातून सरकारी योजनांचे अर्ज, शैक्षणिक व इतर दाखले, रेल्वे तिकीट बुकिंग आदी सेवा दिल्या जातात. मात्र, अनेक केंद्रांनी आपली जबाबदारी पार न पाडल्याने त्यांच्यावर कारवाई अनिवार्य ठरल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.