मोदी सरकारकडून नवरात्रीत २५ लाख मोफत एलपीजी कनेक्शन; नवरात्रीसाठी एक मोठी भेट

नवी दिल्ली : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरात २५ लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या १०६ दशलक्षांवर पोहोचणार आहे.
सोमवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, प्रत्येक कनेक्शनवर सरकारचा ₹२,०५० इतका खर्च होईल. यामध्ये मोफत एलपीजी सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर उपकरणांचा समावेश असेल.
सध्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ३०० रुपयांच्या अनुदानामुळे लाभार्थी कुटुंबांना एलपीजी सिलेंडर फक्त ₹५५३ मध्ये मिळत आहे. ही किंमत जगभरातील अनेक देशांपेक्षा कमी असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.
🔹 महिलांसाठी खास भेट
नवरात्रीत दिलेल्या या भेटीला महिला सक्षमीकरणाचा भाग ठरवत पुरी म्हणाले, “उज्ज्वला योजनेचा विस्तार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांच्या सन्मान आणि सक्षमीकरणाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. माता-भगिनींचा आदर करण्याचा हा संकल्प अधिक दृढ होतो.”
🔹 पात्रता व अटी
गरीब कुटुंबातील प्रौढ महिला
अनुसूचित जाती, जमातीतील महिला
ज्यांच्या घरात एलपीजी कनेक्शन नाही
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो आणि बँक खाते तपशील
🔹 अर्ज प्रक्रिया
इच्छुक महिलांनी https://pmuy.gov.in/e-kyc.html या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
1. तेल कंपनीचे नाव (इंडेन/भारतगॅस/एचपी गॅस) निवडा
2. उज्ज्वला २.० नवीन कनेक्शन पर्याय निवडा
3. राज्य, जिल्हा आणि वितरकाचे नाव भरा
4. मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळणी करा
5. कुटुंब व वैयक्तिक तपशील, पत्ता आणि बँक माहिती द्या
6. सिलेंडर प्रकार निवडून अर्ज सबमिट करा
अर्ज सबमिट केल्यानंतर तयार झालेला संदर्भ क्रमांक जवळच्या गॅस एजन्सीकडे दाखवावा लागेल.
या योजनेमुळे स्वयंपाकासाठी महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळणार असून, ग्रामीण व शहरी भागातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
—