नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचा ‘प्रवेश उत्सव’ आणि डिजिटल शाळेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार
पुणे | प्रतिनिधी
येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये आज सोमवार, दिनांक १६ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रवेश उत्सव आणि डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या विशेष सोहळ्याला पुणे शहर माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी वंदना साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शाळांपैकी एक असून, गेल्या काही वर्षांपासून या शाळेची अवस्था खूपच दयनीय झाली होती. वरील मजल्यावरील हॉलची पत्रे पूर्णपणे जीर्ण झाली होती आणि मागील सीमा भिंत खचली होती. त्यामुळे चोरट्यांना शाळेत शिरकाव करणे सहज शक्य झाले होते.
शाळेच्या या दुरवस्थेची दखल घेत माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधीची मागणी केली. त्यांच्या पुढाकारामुळे प्रारंभी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आणि हॉलच्या छताचे काम पूर्ण झाले. यानंतर तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मिळवून शाळेचा सर्वांगीण विकास करण्यात आला.
या निधीतून शाळेतील २२ वर्गांचे रंगरंगोटीचे काम, डिजिटल टीव्ही (इंटरॅक्टिव्ह पॅनल), प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, मागील भिंतीचे पुनर्निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे, पुणे महानगरपालिकेच्या निधीतून शाळेला पहिली अधिकृत “डिजिटल शाळा” म्हणून मान्यता मिळाली आहे.
या ऐतिहासिक कार्यात माजी विद्यार्थी एजाज खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना संजय सोनवणे, कुणाल बडेकर, अविनाश टिंगरे, संदीप गुंड, सुनील भोपळे, गणेश बाबर, अरुण वाघमारे, कीर्ती माचरेकर, रुपेश गायकवाड, आणि अन्य अनेक माजी विद्यार्थ्यांची साथ लाभली. महिला माजी विद्यार्थिनींपैकी अश्विनी भोसले, चित्रलेखा शिंदे, अपेक्षा निगडे, सलमा शेख, मेघा ओव्हाळ यांचाही सहभाग उल्लेखनीय होता.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी आशा उबाळे आणि वंदना साळवे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक राहुल क्षीरसागर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी विकास ढाकणे साहेबांचे विशेष आभार मानले.
या सोहळ्याने शाळेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.